हेही
वाचाच.. |
|
मागिल
काहि
महिन्यातील लेख. |
|
Advertisement: SMS- JOIN MYSHIVSENA
to 567673434 & become a proud
member of ShivSena's SMS Group. |
|
परीक्षा रेल्वे बोर्डाचीच!
रेल्वे बोर्डातर्फे विविध पदांसाठी दिल्या जाणा-या जाहिराती आणि उमेदवारांच्या होणा-या परीक्षा या गेल्या काही वर् षांपासून महाराष्ट्रात वादाचेच नव्हे, तर दंगलीचेही कारण बनू लागल्या आहेत. तीन वर्षांपूवीर्ही रेल्वे बोर्डाच्या भरतीवरून शिवसैनिकांनी परप्रांतीय तरुणांना मारहाण केली होती आणि यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तेच केले. देशातील सर्व राज्यांमध्ये बेकारीचे प्रमाण प्रचंड आहे आणि सर्वत्र बेरोजगारांचे लोंढे दिसत आहेत. त्यामुळे नोकरी वा उद्योगधंदा यासाठी परराज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या तरुणांना मारहाण करून महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न अजिबात सुटणार नाही. तसेच महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याने परप्रांतांतील बेरोजगार तरुण इथे येतच राहणार, हेही स्पष्ट आहे. त्यांना मारहाण केल्याने फार तर ते घाबरून इथे येण्याचे टाळतील. पण त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील, असे समजणे चुकीचे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परप्रांतीय तरुणांना केलेली मारहाण आणि त्यानंतर राज ठाकरे यांना झालेली अटक, त्यांच्या कार्यर्कत्यांचे आंदोलन हे सारे आता शमले आहे. त्यामुळे डोके शांत ठेवून अनेक बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. डोकी तापलेली असताना भावना अधिक महत्त्वाची ठरते आणि भावना भडकावून लोकांना रस्त्यावर आणणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत चालली आहे. तीन वर्षांपूवीर् रेल्वेमध्ये खलाशी या पदासाठी भरती होती. खलाशी म्हणजे रेल्वे रुळांची देखभाल वा दुरुस्ती करणारे कामगार. ते काम करायला महाराष्ट्रातील सुशिक्षितच काय, पण न शिकलेले तरुणही तयार नसतात. पण पोटापाण्यासाठी कोणतेही काम करायला बिहार आणि उत्तर भारतातील तरुण तयार असतात. अशा वेळी त्यांना मारहाण करून काय उपयोग, याचा विचार सर्वांनीच करायला हवा. यावेळी मात्र असिस्टंट गार्ड व तत्सम पदांसाठी भरती व्हायची आहे आणि त्या परीक्षेसाठी बिहारमधील अनेक तरुण आले होते. पश्चिम रेल्वेमध्ये ही भतीर् व्हायची आहे. पश्चिम रेल्वे विभाग हा मुंबईपासून अहमदाबादपर्यंत आहे. असे असताना पश्चिम रेल्वेच्या भरतीच्या जाहिराती महाराष्ट्राबाहेर देण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पण रेल्वे ही अखिल भारतीय सेवा आहे आणि तिच्यासाठी परीक्षा रेल्वे बोर्डामार्फत घेण्यात येतात. त्यामुळे देशभरातील वर्तमानपत्रांतून भरतीच्या जाहिराती दिल्या जातात. त्यामुळे मुंबईतील मराठी वृत्तपत्रांपासून हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रांपर्यंत तसेच एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिराती देण्यात आल्या होत्या. पश्चिम रेल्वेसाठीची परीक्षा मुंबईतच होते. त्यामुळे देशभरातील तरुण इथेच आले आणि येणार. या परीक्षेला बसणाऱ्या मराठी तरुणांची संख्या खूपच कमी होती, असे सांगण्यात येत आहे. मराठी तरुणांनी अर्ज करूनही त्यांना परीक्षेसाठी बोलावण्यात आले नाही, असाही आरोप केला जात आहे. हा आरोप खरा असेल, तर प्रकरण अतिशय गंभीर आहे. रेल्वेमंत्री बिहारचे आहेत, या कारणास्तव तसे होत असेल वा झाले असेल, तर महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घेऊन केंद सरकारकडे आपला निषेध नोंदवायला हवा. मात्र तत्पूवीर् हा आरोप खरा आहे वा खोटा याची शहानिशा करायला हवी. ती करणे सहज शक्य आहे. रेल्वे बोर्डाने खरी माहिती दिली नाही तर किती मराठी तरुणांनी अर्ज केले होते, त्यांनी राज्य सरकारशी संबंध साधावा, अशा जाहिराती दिल्यास ही माहिती मिळू शकेल. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशीच मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे हे म्हणणे सर्वांना पटू शकेल. महाराष्ट्रातील एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये लाखो तरुणांची नावे आहे. त्यांना का बोलावण्यात आले नाही, असा सवालही भुजबळ यांनी केला. मात्र अखिल भारतीय नोकऱ्या वा सेवांसाठी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नावे नोंदवलेल्या तरुणांना बोलावण्यात येत नाही. स्थानिकांना प्राधान्य मिळायलाच हवे. परप्रांतीय तरुणांना मुंबईत नोकरी मिळाली, तरी राहण्याची व्यवस्था होत नाही. अर्थात मधू दंडवते, सुरेश कलमाडी, राम नाईक हे महाराष्ट्रातील नेते रेल्वेमंत्री असतानाही स्थानिकांना प्राधान्याने नोकऱ्या मिळाल्याचे आठवणीत नाही. पूर्वापार रेल्वेवर उत्तर भारतीयांचा वरचष्मा आहे. रेल्वे बोर्ड महाराष्ट्राबाबत आकसाने वागत असेल, तर त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांना, रेल्वेमंत्र्यांना राज्य सरकारने, खासदारांनी जाब विचारावा. महाराष्ट्रात येणा-या अन्य राज्यांतील बेरोजगार तरुणांना मारणे, हा मार्ग असू शकत नाही.
Read more! / पुढे वाचा..
बाकरवडी
साहित्य: २ कप मैदा २-३ मोठे चमचे बेसन (चणा पीठ) चवीपुरते मीठ १ ते दिड चमचा तेल १ छोटा चमचा ओवा सारणासाठी: १ मोठा चमचा बेसन १ छोटा चमचा तीळ आणि खसखस १ छोटा चमचा आले किसून १ ते दिड चमचा लसूण पेस्ट ३ चमचे लाल तिखट १ ते दिड चमचा पिठी साखर १ छोटा चमचा गरम मसाला १ चमचा धणे पूड १ छोटा चमचा बडिशेप १ चमचा किसलेले खोबरे (सुके खोबरे) ३-४ मोठे चमचे बारीक शेव मीठ
कृती
मैद्याची पोळी: मैदा आणि बेसन एकत्र करून त्यात मीठ आणि ओवा घालावा.तेल गरम करून पीठात घालावे. आणि पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. आणि झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे.
सारण:
१) सर्व प्रथम तीळ आणि खसखस तव्यावर थोडी भाजून घ्यावी.
२) सारणासाठी दिलेले सर्व पदार्थ एकत्र करून १ चमचा तेलावर थोडे परतून घ्यावे.
बाकरवडी: १) सारण तयार झाल्यावर भिजवलेल्या मैद्याची एक पातळ पोळी करून १-२ चमचे सारण त्यावर समान पसरावे.आणि घट्ट रोल करावा.. (जर रोल घट्ट नाही झाला तर त्यातील सारण बाहेर येते.) २) सुरीने १ इंच आकाराचे तुकडे करावे. ३) गरम तेलामध्ये गोल्डन ब्राउन तळून घ्यावेत. ४) बाकरवडया थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.
तयार आहे बाकरवडी.
Read more! / पुढे वाचा..
नारळाच्या वड्या
वाढणी : २० ते २५ वड्या
साहित्य: १ नारळ ३५० ग्रॅम साखर तूप वेलची पूड
कृती : १) एक नारळ खवून घ्यावा. नारळ खवताना त्यातील काळपट भाग घेऊ नये.
२) नंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालावा.
३) मंद आचेवर थोडासा परतून घ्यावा.
४) २-३ मिनिटानंतर साखर घालून परतावे. हळूहळू साखर वितळू लागेल. मंद आचेवर ढवळत राहावे.
५) छोटा अर्धा चमचा वेलचीच पूड घालावी. हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागते.
६) एका परातीला तूप लावून घ्यावे आणि मिश्रण त्यात ओतावे. एका वाटीच्या तळाला तूप लावावे आणि मिश्रण पूर्ण परातीत समान पसरावे. अर्ध्या इंचाचा थर करावा.
७) मिश्रण गरम असतानाच सुरीने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात. नाहीतर मिश्रण थंड झाल्यावर वड्या नीट पडत नाहीत.
८) मिश्रण थंड झाले की वड्या वेगवेगळ्या कराव्यात.
टिप: १) वड्यांना केशरी रंग हवा असल्यास थोडे केशर किंवा खायचा केशरी रंग घालू शकतो.
२) जर आंब्याचा रस उपलब्ध असेल तर साखर घालताना थोडी साखर कमी करून थोडा आंबा रस घालावा. नारळ आणि आंबा एकत्र स्वाद अप्रतिम लागतो.
तयार आहेत नारळाच्या वड्या.
Read more! / पुढे वाचा..
चिरोटे.
वाढणी : साधारण १६ ते १७ चिरोटे
साहित्य: १ कप मैदा १/८ कप पातळ केलेले साजूक तूप १/४ कप दूध वरून पेरायला पिठी साखर पेस्ट बनवण्यासाठी ४ चमचे साजूक तूप + ३-४ चमचे तांदूळ पिठ
कृती: १) मैदा एका भांड्यात घ्यावा त्याला गरम गरम तूपाचे मोहन घालावे. तूप कडक तापवावे, जर मोहनासाठी तूप कमी गरम असेल तर चिरोटे नरम पडतात. दूध घालून मैदा घट्ट भिजवावा. थोडा वेळ झाकून ठेवावे.
२) भिजवलेला मैदा ६ भागात विभागून घ्यावा. त्याचे मध्यम गोळे करून घ्यावे. त्याच्या एकदम पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. जितक्या पातळ पोळया तितके चिरोटे हलके होतील आणि चिरोट्यांना छान पदर सुटतील.
३) एक लाटलेली पोळी घ्यावी. त्या पोळीवर पातळ केलेले साजूक तूप आणि तांदूळ पिठ याची दाटसर पेस्ट लावावी. त्यावर दुसरी पोळी ठेवावी परत त्यावर तूप आणि तांदूळ पिठाची पेस्ट लावावी. त्यावर तिसरी पोळी ठेवून परत पेस्ट लावावी.
४) नंतर दोन बाजूंनी गुंडाळी करत मध्यापर्यंत यावे. एका बाजूची गुंडाळी दुसर्या गुंडाळीवर ठेवून थोडे चेपावे. आणि हि तयार गुंडाळी त्यातील तूप सुकेस्तोवर ठेवून द्यावी. अशाच प्रकारे उरलेल्या ३ पोळ्यांची गुंडाळी बनवून घ्यावी.
५) या गुंडाळ्यांचे १ इंचाचे तुकडे करून घ्यावे.
६) हे चिरोटे दोन आकारात बनवता येतात.
पहिली पद्धत म्हणजे प्रत्येक तुकडा वरील बाजूने हाताने हलका चेपून त्यावर एकदा उभे आणि एकदा आडवे असे लाटणे फिरवावे. दुसरी पद्धत म्हणजे गुंडाळीचे तुकडे वरील बाजूने न लाटता जिथून कापले आहे त्या बाजूला हलके दाबून एकदा उभे आणि आडवे असे लाटणे फिरवावे. या चिरोट्यांचा आकार गोल येतो. आणि दिसायलाही आकर्षक दिसतात. पण यामध्ये आत लावलेली तूप आणि तांदूळपिठाची पेस्ट तळताना बाहेर पडते आणि तूप वाया जाते.
७) तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. तेल गरम झाले कि आच मध्यम करावी. आणि चिरोटे गोल्डन ब्राउन तळून काढावे. पेपरवर काढून लगेच त्यावर २-३ चिमटी पिठीसाखर पेरावी.
टीप: १)वरील प्रमाणानुसार आपण पिठाच्या एकूण दोन गुंडाळ्या बनवल्या आहेत. तूप आणि तांदूळपिठाची पेस्ट हि प्रत्येक गुंडाळीसाठी वेगवेगळी तयार करावी. कारण तूप घट्ट झाले तर हि पेस्ट पोळीवर पसरवता येत नाही. आणि एकदा तांदूळपिठ घातले कि ते तूप गरमही करता येत नाही.
तयार आहेत चिरोटे.
Read more! / पुढे वाचा..
रव्याचे लाडु.
रव्याचे लाडु. साहित्य: २ वाट्या बारीक रवा १ वाटी पाणी दिड वाटी साखर १/२ वाटी साजूक तूप १ लहान चमचा वेलची पूड
कृती: १) प्रथम रवा मध्यम आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला कि गॅसवरून उतरवावा.
२) पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून घ्यावा. (किंवा साखरेचा पाक पारदर्शक झाला कि एक उकळी काढून लगेच उतरवावा.) भाजलेल्या रव्यात पाक ओतावा. गुठळ्या न होता मिक्स करावे. त्यात वेलची पूड घालावी.
३) हे रव्याचे आणि साखरेचे मिश्रण झाकून ठेवावे. काही तासांनी मिश्रण आळते. मग लाडू वळावेत.
टीप: १) जर लाडवाचे मिश्रण फळफळीत झाले तर अर्धी वाटी पाणी लहान पातेल्यात उकळावे. त्यात २-३ चमचे साखर घालावी. पाक बनवून तो मिश्रणात घालावा. मिक्स करावे. थोड्या वेळाने लाडू वळावेत.
२) रव्याच्या लाडवांसाठी शक्यतो बारीक रवा घ्यावा.
तयार आहेत रव्याचे लाडु.
Read more! / पुढे वाचा..
शंकरपाळ्या (गोड/तिखट)
गोड शंकरपाळ्या:
साहित्य: १/४ कप दूध १/४ कप तूप १/४ कप साखर साधारण दिड कप मैदा
कृती: १) दूध, तूप आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत गॅसवर गरम करावे. हे मिश्रण थंड करून घ्यावे. २) मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा घालून मळावे. भिजवलेला मैदा एकदम घट्ट किंवा एकदम सैल मळू नये. मध्यमसर मळावे. मळलेले पिठ २० मिनीटे झाकून ठेवावे. ३) २० मिनीटांनंतर पिठ परत एकदा मळून घ्यावे. २ इंचाचा एक गोळा करून थोडा मैदा भुरभुरवून लाटावे. कातणाने त्याचे शंकरपाळे पाडावेत. आणि तूपात किंवा तेलात सोनेरी रंगावर तळून काढावेत.
तिखट शंकरपाळ्या:
साहित्य: पट्टी सामोस्याच्या उरलेल्या पट्ट्या लाल तिखट मीठ चाट मसाला तळण्यासाठी तेल
कृती: १) पटट्याचे शंकरपाळ्यासारखे चौकोनी तुकडे करावे. व मध्यम आचेवर तेलात तळून काढावे. तळून झाले कि पेपर टॉवेलवर काढून ठेवावे. २) नंतर एका बोलमध्ये घेऊन त्याला तिखट, मिठ, चाट मसाला लावून घ्यावा. हे शंकरपाळे एकदम कुरकुरीत आणि चविष्ट लागतात.
तयार आहेत शंकरपाळ्या.
Read more! / पुढे वाचा..
चिवडा
साहित्य: ८ कप पातळ पोहे दिड ते २ कप कुरमूरे ३/४ ते १ कप शेंगदाणे १०-१२ काजू बी १०-१२ हिरव्या मिरच्या १०-१२ कढीपत्ता पाने १/२ कप तेल १/२ टिस्पून हिंग, १ टिस्पून हळद, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जीरे चवीनुसार मीठ, साखर
कृती :
१) पातेल्यात तेल गरम करावे. सर्वात आधी शेंगदाणे, काजू थोडे तळून घ्यावेत. शेंगदाणे आणि काजू ब्राऊन रंगाचे झाले कि एका वाडग्यात काढून ठेवावेत.
२) त्याच तेलात मोहोरी, जीरे, हिंग, हळद, मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. तळलेले शेंगदाणे, काजू घालून लगेच पोहे आणि कुरमुरे घालावे आणि सर्व पोह्यांना तेल लागेल असे मिक्स करावे. हे करताना गॅस बारीक ठेवावा. नाहीतर तळाला पोहे जळू शकतात.
३) गॅस बंद करून चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालावी. आणि व्यवस्थित ढवळून घ्यावे.
टीप: १) चिवड्यात मनुका, सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, डाळं घालायचे असेल तर शेंगदाण्यांबरोबर ते तळून घ्यावे.
२) फोडणी करताना लसणीच्या पाकळ्या कापून घातल्यास चिवड्याला लसणीचा छान स्वाद येतो.
३) चिवड्याला थोडा आंबटपणा हवा असल्यास, चिवडा गरम असताना १ टिस्पून आमचूर पावडर घालून मिक्स करावे.
तयार आहे चिवडा.
Read more! / पुढे वाचा..
अनारसे
साहित्य: १ कप तांदूळ १ कप किसलेला गूळ १ चमचा तूप खसखस तळण्यासाठी तूप / तेल
कृती:
१) तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे.
२) चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर घालून कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे.
३) किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात घालून मळावे. घट्ट मळलेला गोळा ५-६ दिवस डब्यात भरून ठेवावा. स्टिलचा डबा वापरू नये शक्यतो प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिक पिशवीत भरून प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवावे.
४) ५-६ दिवसांनी हे पिठ बाहेर काढावे. तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल / तूप गरम करावे. २-३ सुपारीएवढे गोळे करावे. पुरीसारखे लाटावे. लाटताना खसखशीवर लाटावी. हि पुरी तळताना खसखस असलेला भाग वरती ठेवावा आणि तळताना पुरीची बाजू पलटू नये, नाहीतर खसखस जळू शकते.
५) पुरी तेलात टाकल्यावर फुलते व थोडी पसरट होते त्यामुळे झारा आणि एक स्टीलचा चमचा तेलातील पुरीच्या कडेने धरावा म्हणजे पुरी तुटणार नाही व गोल राहिल.
६) अनारसे तळताना बर्याचदा तो फसफसतो (हसतो). तेव्हा पिठाचा गोळा तसाच ठेवून द्यावा, नंतर वापरावा कारण हे पिठ ५-६ महिने सहज टिकते.
७) अनारसे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढावेत. चाळणीत उभे करून तेल निथळून जाऊ द्यावे.
तयार आहेत अनारसे.
Read more! / पुढे वाचा..
चकली
साहित्य: १ कप चकलीची भाजणी १ कप पाणी १ टिस्पून हिंग २ टिस्पून पांढरे तिळ १/२ चमचा ओवा १ टेस्पून लाल तिखट १ टेस्पून तेल चवीपुरते मिठ
कृती: १) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे. २) पाणी उकळले कि चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे. ३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे. ४) चकलीच्या सोर्याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही. सोर्यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.
चकलीची भाजाणी: वाढणी : साधारण दिड किलो
साहित्य: दिड कप चणाडाळ १/२ कप उडीदडाळ १/२ कप मूगडाळ २ कप तांदूळ १/४ कप साबुदाणा ५० ग्राम जिरे (साधारण १/४ कप) मूठभर धणे
कृती: १) सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती न धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात. २) तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावेत. ३) सर्व डाळी वेगवेगळ्या ब्राऊन रंग येईस्तोवर भाजून घ्यावेत. तांदूळ आणि साबुदाणे वेगवेगळे भाजून घ्यावेत.जिरे धणे भाजून घ्यावेत. ४) सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व ईतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे. थंड झाले कि बारीक दळून आणावे.
तयार आहे चकली.
Read more! / पुढे वाचा..
शाकाहारी सॅंडवीच
वाढणी - १ सॅन्डविच
साहित्य: २ ब्रेडचे स्लाईस काकडीचे पातळ काप ६-७ टोमॅटोचे पातळ काप ५ शिजलेल्या बटाट्याचे पातळ गोल काप ४-५ कांद्याची पातळ चकती १-२ १ टेस्पून बटर चिमूटभर काळे मिठ
:::::हिरवी चटणी:::: दिड कप कोथिंबीर ४-५ हिरव्या मिरच्या १ टिस्पून जिरपूड किंचीत साखर चवीनुसार मिठ
कृती: १) सर्वात आधी हिरवी चटणी बनवून घ्यावी. दिड कप कोथिंबीर, ४-५ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून जिरपूड, चवीनुसार मिठ, साखर आणि थोडे पाणी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून चटणी करावी.
२) ब्रेडच्या कडा नको असतील तर काढून टाकाव्यात. दोन्ही ब्रेडच्या एका बाजूला आधी बटर आणि चटणी लावून घ्यावी.
३) एका ब्रेडवर आधी काकडीचे काप पसरून लावावेत. त्यावर टोमॅटोचे काप ठेवावेत. त्यावर काळे मिठ भुरभुरावे. त्यावर बटाट्याच्या चकत्या लावाव्यात, किंचीत मिठ पेरावे आणि त्यावर कांद्याची चकती ठेवावी. बटर आणि चटणी लावलेला ब्रेडचा स्लाईस यावर ठेवावा.
सुरीने तुकडे करावेत.
हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.
तयार आहे शाकाहारी "सॅंडवीच"
Read more! / पुढे वाचा..
|
|
ओळख
ब्लॉगरशी. |
|
आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच
आशा ठेवतो. |
|
सेन्सेक्स चे आकडे
(LIVE) |
|
BSE |
|
NSE |
|
सौजन्य:
economictimes.com indiainfoline.com
ताज्या
बातम्या / Latest News |
|
|