राज असा अवलक्षणी का झाला?- शिवसेनाप्रमुख
काही उडाणटप्पू लोकांनी राजच्या कानात हवा भरली आणि तो वाकड्या तिकड्या उड्या मारू लागला. तो मातोश्रीवरच मोठा झाला , माँने त्याला जेवू खाऊ घातले , माझ्या अंगाखांद्यावर खेळला. पण तरीही असा अवलक्षणी का झाला याचा विचार करतोय... अशा शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं मन मोकळं केलं. ‘ सामना ’ ला दिलेल्या मुलाखतीच्या अखेरच्या भागात त्यांनी या भावना व्यक्त केल्या. त्यातच त्यांनी , मी राजला लहानपणापासून पाहतोय. त्याच्या मनसेविषयी मला काहीच बोलायचे नाही. पण एवढे नक्की की राज आणि त्याच्या मनसेकडून शिवसेनेला कोणताही धोका नाही. शिवसेना एकनिष्ठ आहे आणि तशीच राहील , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तो आम्हाला काही त्रास देण्याची शक्यता नाही असे सांगितले. मात्र मनसेशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे देणे टाळले. राज शिवसेनेचेच मुद्दे वापरुन राजकारण करू पाहतोय हे मात्र त्यांनी मान्य केले. त्याचवेळी मराठीचा मुद्दा आम्हीच प्रथम मांडला आणि आजही त्याबाबत आग्रही असल्याचे ते म्हणाले. देशहितासाठी हिंदुत्वाचा आग्रह धरला तरी मराठीच्या मुद्याकडे दुर्लक्ष केलेले नाही , असेही त्यांनी सांगितले. इस्लाम हा देशाला घातक आहे , त्याविरोधात लढायला हवे असे ते म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी कौतुक केले. दक्षिण भारतीय भाषेच्या मुद्यावर आणि उत्तर भारतीय त्यांच्या हितासाठी एकत्र येतात तर मराठीकरिता आमच्या खासदार , आमदारांनी एकत्र येण्यात गैर काय ? , असा प्रश्न करत शिवसेना प्रांतवादाचे किंवा भाषेचे राजकारण करत देश तोडत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. मनसे अथवा राष्ट्रवादीशी भविष्यात युती करण्याबाबत प्रश्न विचारताच त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही.
मात्र भाजपशी रुसवे फुगवे सुरू आहेत पण युती कायम असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान पदाचा उमेदवार हा कोणत्या भाषिक गटाचा आहे त्यापेक्षा तो सक्षम आहे का ? , हे तपासायला हवे असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणूक जिंकून महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणणे हेच सध्याचे लक्ष्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
0 Comments:
Post a Comment
Feel free to type your comments here
Subscribe to Post Comments [Atom]