'मराठी माणूस' थोडासा नाराज आणि बराचसा शरमिंदा
...
अलीकडे लोकांना इतिहासाचा धांडोळा घेण्यापेक्षा वर्तनामानातील ताज्या वास्तवाची चर्चा आवडते. माझ्यासारख्या स्वत:ला थोडाफार बुद्धिजीवी मानणाऱ्या लेखक, कलाकार प्रकृतीच्या माणसाला कधी कधी इतिहासाच्या पानांत हरवून जायला आवडत असले तरी सर्वसामान्य माणसांना मात्र वर्तमानाच्या चौकटीत राहून भविष्याचा विचार करणे जास्त आवडते.
गेल्या काही दिवसांत देशभरातील लोकांनी मराठी माणूस हे नाव वारंवार ऐकले. दूरचित्रवाणीवरील सर्व वृत्तवाहिन्यांवर, वर्तमानपत्रांमध्ये त्याची व्यंगचित्रे सगळ्यांनी पाहिली. मुंबई शहर कोणाच्या बापाचे? सारखे सवाल ऐकले. जळणाऱ्या बसगाड्या, रस्त्यावर उतरलेले लोक, दगडफेक पाहिली, नारेबाजी ऐकली. या सगळ्या चचेर्त सतत एका युवा नेत्याची छबीसुद्धा पाहिली. त्या छायाचित्रातील व्यक्तीच देशभरात चचेर्ला कारणीभूत ठरली. राज ठाकरे, हे त्या माणसाचे नाव. वयाने छोटेखानी वाटला तरी मुंबईतील नव्याकोऱ्या विरोधी पक्षाचा हा प्रमुख. त्यानेच भारतीय राज्यघटना, महाराष्ट्र सरकार या दोघांनाही आव्हान दिले-आ बैल मुझे मार!
हल्लीच्या राजकारणात हे असेच सुरू आहे. आपणही या सगळ्याला 'रिआलिटी शो' किंवा 'रोड शो'ला मनोरंजनाचे नवे माध्यम मानायला लागलो आहोत. जोवर प्रत्यक्ष आपल्यावर हल्ला होत नाही तोवर या समस्येवर गांभीर्याने विचार करण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही. काश्मीरपासून केरळपर्यंत, गुजरातपासून ओरिसापर्यंत किंवा कर्नाटकपासून आसाम आणि मणिपूरपर्यंत घडत असलेल्या अशा कितीतरी लांच्छनास्पद घडामोडींना आपण 'राजकारण' मानून दुर्लक्ष करतो. एकट्या बिचाऱ्या 'मराठी माणसाला'च आरोपीच्या पिंजऱ्यात कशाला उभे करावयाचे? शेवटी महाराष्ट्र हा ही देशाचाच घटक नाही का?
पण, थांबा जरा! राजसाहेबांच्या मते महाराष्ट्र हा जरी भारताचा घटक असला तरी येथे नोकरी-कामधंद्यासाठी बिहार आणि उत्तर प्रदेशातून लाखो लोक घुसखोरी करीत आहेत आणि यापुढेही घुसतच राहतील. त्यांना रोखण्याचे काम महाराष्ट्राच्या सरकारने केले नाही तर त्यांचा पक्ष रस्त्यावर उतरून ते करेल. त्यांच्या दृष्टीने हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्ान् आहे.
राजकारणात प्रत्येक घटना तिच्या नियोजित वेेळीच होते किंवा घडवून आणली जाते. आगामी काळ हा देशभरात निवडणुकांचा आणि म्हणूनच नेत्यांसमोरच्या आव्हानांचा आहे. सध्या महाराष्ट्रात काँगेस आणि राष्ट्रवादी काँगेस यांंचे आघाडी सरकार आहे. त्या दोन पक्षांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. विरोधात शिवसेना आणि भाजप हे समोर उभे ठाकले आहेतच. इतर छोटे-छोटे पक्ष आणि संघटना आपापल्या मतपेढ्यांची पुंजी घेऊन या मोठ्या पक्षांकडे जातील आणि त्यांना परस्परांवर बंदुका चालवण्यासाठी आपापले खांदे भाड्याने देतील.
अर्थात, यामुळे महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या परिस्थितीत कायसा फरक पडणार? महाराष्ट्राची संस्कृती तसेच भविष्यातील विकास यावर काय परिमाण होईल? या सगळ्यामुळे महाराष्ट्राची ताकद वाढून दुनियेत महाराष्ट्राचे मोठे नाव होणार आहे का? संत-महंत, ज्ञानी-पंडित, वीर आणि त्यागी नेत्यांची ही महाराष्ट्राची कर्मभूमी हा नवा भार कसा काय पेलू शकेल? राज ठाकरे हे काही शिवाजी महाराज नाहीत किंवा संत तुकारामही नाहीत. ते जयंत नारळीकरही नाहीत किंवा सचिन तेंडुलकरही नाहीत. ते आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे. बाळासाहेबांचा मुलगा नसल्याने शिवसेेनेचे सिंहासन त्यांच्या वाट्याला आले नाही. हा महाराष्ट्रातील एका कुटुंबातील खासगी मामला आहे. आपल्या सर्वांना व्यापून उरणारे ते काही महाभारत नव्हे!
राज ठाकरे यांच्या आंदोलनाच्या मागे काही आर्थिक आणि सामाजिक मुद्दे जरूर आहेत. त्यांचे बहुसंख्य समर्थक हे निम्नमध्यम वर्गातले आहेत. राज ठाकरे यांच्या लढाया लढणारे बहुतेक सारे तरुण मागास वर्गातलेच आहेत. 'लुंपेन प्रोलेटरिएट' अशा शब्दांत कार्ल मार्क्स ज्यांचे वर्णन करतो तोच हा वर्ग. या लोकांकडे ना स्वत:ची संपत्ती आहे, ना उत्पन्नाचे काही साधन, ना रोजगार, ना नोकरी. असे देशभरात सुमारे २० टक्के तरी लोक असतील. त्यांचे वयोमान साधारण १७ ते ३० या दरम्यान मानले तर आगामी निवडणुकीत ही एक मोठी व्होट बँक ठरणार आहे. सत्तेची सगळी समीकरणे हे लोक बदलून टाकू शकतात. त्यांचे हे महत्त्व इतर राजकीय पक्षही नाकारू शकत नाहीत. लोकशाही आणि राजकारणाचे इमले जमीनदोस्त करण्याची ताकद या खालच्या स्तरातील तरुणांच्या अंगात आहे. राज ठाकरे एकटेच नाहीत. त्यांच्या पाठीमागेही लोक आहेत. राज ठाकरे यांची मदत घेऊन आत्ता निवडणूक लढवायची आणि एकदा निवडणुका पार पडल्या की त्यांचाही समाचार घ्यायचा, असेही काही बड्यांनी रचलेले कारस्थान या साऱ्यामागे असू शकते.
चाळीसएक वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर राज्य करणारे काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि काही उद्योगपतींच्या मदतीने शिवसेना राजकारणात उभी राहिली. तेव्हाही निरपराध माणसांचे प्राण घेणारी, मालमत्तेची नासधूस करणारी हिंसक दंगल मुंबईवर कोसळली होती. तेव्हाचे केंदीय मंत्री मोरारजी देसाई यांना शिवसेनेने मुंबईत 'प्रवेश बंद' केला होता. अखंड तीन दिवस मुंबईत हा तमाशा सुरू होता. तेव्हाही मुंबई पोलिसांनी अशीच बघ्याची भूमिका घेतली होती. वसंतराव नाईक हे इंदिरा गांधी यांचे निष्ठावान सेवक होते आणि इंदिरा गांधी व मोरारजी परस्परांचे वैरी; हे तर आपण सारेच जाणतो.
सांप्रतकाळी कोण कोणाचा मित्र आणि कोण शत्रू याचा अंदाज लावणे फारसे कठीण नाही. निवडणुकांपूर्वी छोटे-मोठे राजकीय पक्ष स्वत:ची ताकद आजमावून पाहात आहेत. ममता बॅनजीर्, वायको, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित छुप्या संघटना, सीमी, इंडियन मुजाहिदीन, पश्चिम बंगालमधील डावे कार्यकतेर्- या सगळ्यांच्या आंदोलनाचे, निषेधाचे रोख आणि रंग वेगवेगळे असतील. मात्र, यापैकीही कोणीही आपल्या राजकीय स्वार्थार्साठी भारताच्या राज्यघटनेला आव्हान द्यायला मागेपुढे पाहणार नाही. (दिलीप पुरुषोत्तम चित्रे )
4 Comments:
नमस्कार मी आशिष गोडसे आपल्या महाराष्ट्र माझा या ब्लॉग चा नियमित वाचक आहे.
आपल्या " 'मराठी माणूस' थोडासा नाराज आणि बराचसा शरमिंदा " या लेखात आपणास नेमके काय सुचवायचे आहे किंवा काय म्हणावयाचे आहे हे समजत नाहीये. लेखाच्या नावावरून विषय समजू शकतो पण लेख समजला नाही.
आपण " परीक्षा रेल्वे बोर्डाचीच! " या लेखावरील माज्या कमेन्ट ला रिप्लाय दिला नाहीये कारण समजू शकेल का मला??????
धन्यवाद आशिष... हा लेख मी इथे केवळ चर्चा घड्वुन आणण्यासाठी मि टाकलेला आहे. हा लेख मी लिहीलेला नसुन लेखकाचे नाव दिले आहे. मराठी माणसे जिथे परप्रांतीय आहेत, म्हणजेच महाराष्ट्रा बाहेरील मराठी माणसाचे विचार इथे लेखकाने व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे.
मी तुझ्या मागच्या कंमेंट्सला सुद्धा रिप्ल्याय दिलेला आहे.
नियमीत पणे ब्लॉगला भेट देउन माझा उत्साह वाढवणार्या सर्वांना आणि तुला, धन्यवाद.
आशिष कुलकर्णी.
ब्लॉगर
ज्येष्ठ साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी 'संवाद' पुरवणीत 'थोडासा नाराज आणि बराच शरमिंदा!' असा लेख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेने चालवलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने लिहिला होता. या लेखावर कवी-लेखक सलील वाघ यांची ही सविस्तर प्रतिक्रिया
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3746149.cms
इथे वाचा ह्या लेखा वरची प्रतिक्रिया आणि मग कमेंट्स द्यायला विसरु नका.
जय महाराष्ट्र!
आररे २ महिने झाले तरी मी पोस्ट केलेल्या पोस्ट वर कोणाचा रिप्लाइ नाही ...
कोण काय बोलणार बोलण्या सारखे काही आसेल तर बोलावे ...
जय महाराष्ट्र!
Post a Comment
Feel free to type your comments here
Subscribe to Post Comments [Atom]