नारायण राणे काँग्रेसमधून निलंबित
मुख्यमंत्रिपदी अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर होणार, हे स्पष्ट झाल्यानंतर भडकलेल्या नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला होता. काँग्रेसवर माझा विश्वास नाही, अगदी सोनिया गांधींवरही नाही. केवळ पैशासाठी, स्वार्थासाठी हा पक्ष चालवला जातोय, त्यामुळे मला या पक्षात कुठलंही पद नको, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यांचा हा आविर्भाव पाहून, ते काँग्रेसला राम-राम करतील, असेच संकेत मिळाले होते. परंतु, त्यांनी काही घोषणा करण्याआधीच, आज काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना निलंबित केल्याची घोषणा केली.
राणेंच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होतेच. त्यानुसारच आज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी राणेंना निलंबित करत असल्याचं जाहीर केलं.
राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही!
माझं क्वालिफिकेशन काय, हे सांगण्यासाठी मला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही ' , असं ठणकावून सांगत महाराष्ट्राचे नियोजित मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांना सणसणीत टोला लगावला आहे.
अशोक चव्हाण यांनी आज सकाळी चैत्यभूमीला भेट देऊन महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यानंतर, राणेंच्या कालच्या टीकेबद्दल विचारलं असता, त्यांनी राणेंना थेट धुडकावूनच लावलं.
मुख्यमंत्री घोषणेला उशीर का झाला?
मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर प्रणव मुखर्जी व ए. के. अँटनी या निरीक्षकांनी गुरुवारी रात्री आपले मत फोनवरून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना कळवले होते; मात्र, बैठकीबाहेर नारायण राणे यांचे समर्थक जमले असून नव्या नेत्याची घोषणा केल्यास गोंधळ होऊ शकतो, याची जाणीव झाल्याने निर्णय शुक्रवारपर्यंत लांबला!
हायकमांडने आपल्या इच्छेनुसार मुख्यमंत्री लादला, असा आक्षेप सोनियांना नको होता. यासाठी शुक्रवार सकाळपासून राणे यांना शांत करण्यासाठी काय करता येईल, याची त्यांच्या निकटवतीर्यांकडे चौकशी सुरू झाली. सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यास राणे यांचा फार आक्षेप रहाणार नाही. ते शांत होऊ शकतील, असे काहींनी सुचवले. निवडणुकीच्या वर्षात दोन गटांचे भांडण विकोपाला नेण्याऐवजी मध्यममार्ग म्हणून पुन्हा एकदा सुशीलकुमार यांची निवड करण्याचाही सोनियांच्या निवासस्थानी गांभीर्याने विचार झाला. त्याचवेळी, हायकमांड आपल्या नावाला अनुकूल नसून अशोक चव्हाण यांचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचा सुगावा लागताच राणे यांनी मुंबईत तडकाफडकी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेतृत्वासह सगळ्यांवरच हल्लाबोल केला. दिल्लीत याचे वृत्त धडकताच शिंदे भूतानहून भारतात परतण्याची वाट पाहाण्यासही वेळ उरला नाही. त्यामुळे राणे यांचा मुंबईत हल्लाबोल सुरू असतानाच चव्हाण यांच्या नावाची घोषणा दिल्लीत झाली.
नेतेपदाच्या निवडीबाबत एकूण ९७ आमदारांची मते जाणून घेण्यात आली. विधानसभेच्या ७५ सदस्यांपैकी ७२, विधान परिषदेच्या २१ सदस्यांपैकी १६ तसेच सत्ताधारी काँग्रेसला सहकार्य करणाऱ्या १२ अपक्ष व सहयोगी सदस्यांपैकी ९ सदस्यांनी मोकळेपणाने आपली भूमिका पक्ष निरीक्षकांपाशी व्यक्त केली.
0 Comments:
Post a Comment
Feel free to type your comments here
Subscribe to Post Comments [Atom]